वृद्धाश्रम : काळाची गरज की नाईलाज ?
©तुषार नातू
‘वृद्धाश्रम ‘ हा शब्द ऐकला की अनेकांच्या मनात एकदम कणव दाटून येते सोबतच ‘ बिच्चारे ‘ असाही शब्द उमटतो मनात ..
आयुष्यभर संसारासाठी मरमर कष्ट केलेल्या घरातील व्यक्तिला ती व्यक्ती वृद्ध झाल्यावर असे ‘ वृद्धाश्रमात ‘ नेवून टाकणे म्हणजे क्रूरपणा आहे असेही वाटते..
घरातील वृद्धांची सेवा करण्याऐवजी त्यांना वृद्धाश्रमात ठेवणारी मुले कृतघ्न आहेत असा भाव मनात येतो..
खरोखर वृद्धाश्रम इतका वाईट असतो का?
तेथे जावे लागणे म्हणजे त्या व्यक्तीला वाऱ्यावर सोडणे असते का…?
मूले इतकी कृतघ्न असतात का ? सर्वच वृद्ध दयनीय अवस्थेत असतात का…?
या प्रश्नांच्या विचार न करता ‘ वृद्धाश्रम ‘ म्हणजे जणू एखादी शिक्षाच असाच सर्वसामान्यांचा दृष्टीकोन तयार झालेला आहे ..या बाबत सर्वार्थाने विचार होणे गरजचे आहे असे वाटते…
१ ) एकुलता एक मुलगा अथवा मुलगी मोठी होवून परदेशात स्थायिक झाली आहे ..
भारतात म्हातारे आईवडील एकटे राहत आहेत…
मुलांना इच्छा असूनही त्यांची सेवा करता येत नाहीय… वृद्ध आईवडील एकटे राहत असल्याने त्याच्या सुरक्षेचा देखील प्रश्न आहेच शिवाय त्यांच्या आरोग्याची वेळच्या वेळी काळजी घेणे पण गरजेचे आहे… मुले पैसा देवू शकतात आईवडिलांना भरपूर मात्र त्यांना भारतात येवून आई वडिलांसोबत रहाणे शक्य होत नाहीय… आईवडील आता या वयात परदेशी कायमचे राहायला जाण्यास तयार नाहीत ..त्यांची नाळ इथे भारतातच आहे ..त्यांना सक्तीने परदेशात नेवू शकत नाही … अशावेळी काय करावे ?
२ ) सर्व मुलांची लग्न होवून ती आपापल्या संसारात मग्न झालेली आहेत… घर लहान असल्याने मुलांनी आपापला वेगळा निवारा शोधला आहे… सर्व मुलांचे आईबाबांवर प्रेम आहे तरी आपापल्या संसारातून अगदी रोज आईबाबांना भेटणे शक्य नाही… दुरून जास्त लक्ष ठेवता येत नाही… आईबाबांची इच्छा आहे मुलांकडे राहायची…
मात्र ते घर देखील लहान आहे वेगळी सोय करणे कठीण आहे कारण मुलगा अन सून दोघेही नोकरी करतात ..
वृद्ध आईवडिलांची सेवा करण्यास त्यांना वेळ नाही.. मग पर्याय काय ?
३ ) सर्व मुलींचे लग्न होवून त्या आपापल्या सासरी सुखात नांदत आहेत… मुली वर्ष सहा महिन्यातून आईबाबांना भेटायला येतात…
मात्र सतत आईवडीलां सोबत राहणे मुलीना त्यांच्या संसारामुळे शक्य नाही…
मुलींच्या सासुरवाडीत देखील त्यांचे वृद्ध सासू सासरे आहेतच…
तेथे आईबाबांना नेणे शक्य नाही…
शिवाय जावयाच्या घरी रहाणार नाही हा आईबाबांचा हट्ट… मुलीना आईबाबांच्या आरोग्याची काळजी आहेच…
मग कोणीतरी लक्ष ठेवावे ही इच्छा ..
४ ) आई किवा बाबा यांचे पैकी कोणीतरी एक जिवंत आहे… एकटेपणाला अतिशय कंटाळलेला जीव… घरात नवराबायको दोघे नोकरी करणारे… मुले मोठ होवून त्यांच्या व्यापात मग्न…
कोणाला वेळही नाही घरातील वृद्ध व्यक्तीशी बोलायला… त्या व्यक्तीला कोणताही छंद नाही… काही सकारात्मक करण्याची इच्छा नाही… सतत प्रकृतीच्या तक्रारी सांगणे नाहीतर घरात सारख्या सूचना देणे… मुलांना सुनांना रागावणे…
अगदी गुप्तहेरा सारखे घरात लक्ष…
वडिलधारे पणाचा अधिकार हाच जगण्याचा एकमेव आधार… येता जाता प्रत्येकाला प्रश्न…अन सल्ले देण्याची हौस…
अगदी घरातील मंडळी कंटाळतील इतका मुलांच्या संसारात हस्तक्षेप… घरतील तरुण मुलांना जाच वाटावा असे अधिकार गाजवणे ..
मनाविरुद्ध झाले की रुसून बसणे..
५ ) निपुत्रिक जोडपे आहे… हाताशी पैसा आहे… मात्र घरात त्यांची काळजी घेणारे कोणी नाही.. सतत घरात दोघेच… मग कंटाळा येणे स्वाभाविक… अशा वेळी कोणीतरी नातलगाने सुचवलेला वृद्धाश्रमाचा पर्याय… वर दिलेले मुद्दे विचार करण्यासारखे आहेतच… शिवाय भारतीय संस्कृतीत जी ‘ वानप्रस्थाश्रम ” ची कल्पना सांगितली आहे त्या नुसार… सर्व संसारिक जवाबदार्या पार पडल्यानंतर मोहातून सुटका करून घेण्यासाठी सर्व जवाबदारी मुलांवर सोपवून वृद्धांनी वनात जावून राहावे अथवा तीर्थयात्रेला निघून जावे… उर्वरित आयुष्य केवळ परमेश्वराच्या चिंतनात व्यतीत करावे…
सध्याच्या काळात वनात जावून राहणे अथवा तीर्थस्थानी कायमचे राहणे कठीणच… अशा वेळी जर घरतील वृद्धांनी स्वतःहून उर्वरित जीवन परमेश्वराच्या चिंतनात व्यतीत करायचे ठरवून जर वृद्धाश्रमात जावून राहायचे ठरवले त्यात गैर काय ? काही काही घरामंधून मी घारतील वृद्धांची अतिशय वाईट परिस्थिती पहिली आहे…
१ ) घरात वृद्धाना सन्मानाने वागवले जात नाही… त्यांना झेपत नसली तरी घरातील लहान मुल सांभाळायची… घरातील किरकोळ कामे करण्याची… घर सांभाळण्याची… जवाबदारी त्यांच्यावर सोपवली जाते… अनेकदा बोलणी खावी लागतात…
२ ) घरातील वृद्धांशी बोलायला कोणाला वेळ नसतो… दिवसभरात अगदी दोनचार वाक्ये ती देखील नाईलाजाने बोलली जातात ..
सून फटकळ असेल तर वेळोवेळी पाणउतारा असतोच… त्यांच्या जेवणाच्या आवडीनिवडी जपल्या जात नाहीत… जर वृद्धाना पेन्शन नसेल तर त्यांना प्रत्येक वेळी मुलांपुढे हात पसरावा लागतो…
३ ) सून मुलगा दोघेही नोकरी करत असतील तर मुलांची शाळेची तयारी करणे… त्यांना शाळेत सोडायला–आणायला जाणे… फिरायला घेवून जाणे…
त्याच्या जेवणाच्या वेळा सांभाळणे अशीही कामे घरातील वृद्धांकडे त्यांच्या क्षमता लक्षात न घेता सोपवली जातात… म्हणजे कधी कधी घरातील वृद्धांची अवस्था हक्काच्या नोकरासारखी असते…
जरी आपल्या म्हाताऱ्या आईवडिलांना वृद्धाश्रमात ठेवणे हा क्रूरपणा अथवा कृतघ्न पण वाटत असला तरी वरील मुद्द्यांवर विचार केला तर अनेकदा वृद्धाना जास्त सुरक्षित असे ठिकाण वृद्धाश्रम आहे असे वाटू शकते…
मी वृद्धाश्रमाचे समर्थन करत नाहीय तर फक्त दुसरी बाजू मांडतो आहे…
खरे तर जे निम्न मध्यमवर्गीय आहेत अथवा गरीब वर्गातील आहेत त्यांना खाजगी वृद्धाश्रमाचा खर्च परवडणे कठीणच…
सरकार वृद्धाश्रमाना अनुदान देते मात्र या क्षेत्रात देखील पैसे कमावण्याच्या उद्देशाने अनेक लोक सामील झाले आहेत… त्यामुळे सरकारी अनुदान असलेले वृद्धाश्रम कधी कधी दयनीय अवस्थेत असतात…
जास्तीत जास्त समाजसेवी संस्थांनी अन शासनाने देखील वृद्धाश्रम हा केविलवाणा न वाटता जास्त सुखदायी मनोरंजनात्मक असावा असा दृष्टीकोन ठेवला तर उलट वृद्धांना उर्वरित आयुष्य आनंदाने जगता येईल… वृद्धाश्रम हा ‘ आनंदाश्रम ‘ होईल…
तरीही हे सांगेनच की घरतील वृद्धांची काळजी घ्या… आपणही कधीतरी म्हातारे होणार आहोत हे विसरू नका… तसेच वृद्धांनी आता घरात लक्ष घालणे कमी करा…
सूचना सल्ले बंद करून अधिकारवाणी ने जगण्याऐवजी आपुलकीने वागा घरतील लोकांशी …
त्यांना आपण कटकट न वाटता हवेहवेसे वाटलो पाहिजे असे वर्तन ठेवा…
©तुषार नातू,
निर्धार व्यसनमुक्ती केंद्र,
डाॅ. जी. डी .पोळ फाऊंडेशन , येरळा आयुर्वेदिक हाॅस्पिटल,
४ था मजला, खारघर, सेक्टर ४ , नवी मुंबई ..