Something Different
प्रतापगड ते रायगड ट्रेक एक अविस्मरणीय अनुभव…
प्रतापगड ते रायगड ट्रेक एक अविस्मरणीय अनुभव…
©तेजस डोळे
हा रेंज ट्रेक पूर्ण होऊन जवळपास ६ महिने झालेत, पण मन अजून जावळीच्या डोंगरावरच अडकलंय.
उठसुठ सह्याद्रीचा डोंगर खुणावतोय, रायरीचा पर्वततर डोक्यातून हटता हटत नाहीये..!! कारण विषयचं तेव्हढा खोल होता या ट्रेकचा…!!!
ट्रेक ची सुरुवात प्रतापगडी महाराजसाहेबांनी स्थापन केलेल्या मंदिरात भवानी मातेच्या ओटीभरणाने सुरू होऊन शेवट रायरीला धन्याच्या समाधीपुढं मुजरा घालून होतो आणि आम्ही तो जगतो हेच मोठं भाग्य आमचं..!!!
ठरल्याप्रमाणे तुळजाभवानीचं दर्शन घेऊन आम्ही रायगड कडे कूच केली अन पहिल्याच टप्प्यात जावळीच्या जंगलाने आपल्या रौद्र रूपाचे दर्शन घडवले. तेव्हा त्यो चंदू मोऱ्या जावळीच्या जीवावर इतका माज का करत असेल याचा उलगडा देखील झाला.
दुपारी सावित्री नदीचं मिनरल वॉटरला झक मारायला लावणारं पाणी पिऊन, नदीपात्रात तयार झालेली जावळीची स्पिती व्हॅली ओलांडली.
२००० फुटी डोंगर चढाई करताना भर दुपारी सुर्याचा कसा (कहर) उठतो हे सगळ्यांनी अनुभवले.
या चढाईला जेकेच्या(एक मित्र) तर पार कपाळावर दिसणाऱ्या आठ्या पाहून जेवनानंतर ऑरगॅनिक लिंबू या विषयाच्या नावावर छोटेखानी विश्रांतीचा बेत पूर्ण झाला, मग स्वारी पहिल्या दिवसाच्या अंतिम टप्प्याकडे वळली.
पहिल्या दिवसाच्या खडतर प्रवासाचा उत्तरार्ध असलेला हा टप्पा सर्वांसाठी नवसंजीवनी देणारा ठरला..!
कारणही तसेच होते, शूरवीर सुभेदार तानाजी मालुसरे अन शेलार मामा यांच्या गावात पोरं पोचलेली, त्यांच्या समाधीवर मन इतके भावनात्मक गुंतले की आपसूक डोळ्यांतून पाणी आले.
मैत्रीचं, त्यागाचं अन पराक्रमाच परमोच्च उदाहरण म्हणजे तानाजीराव..!!!
ओंकारदादा, बोलत असताना अक्षरशः शरीरातून जीवच काढून घेतलेला बघा, इमोशनल असणे ही एक ताकत आहे हे इथंच उमजले..!!!
दुसऱ्या दिवशी पहाटेच चार ला उठून ट्रेक चालू केला, कारण काय तर भर दुपारी सूर्याचा उठतो (कहर) म्हणून ओ. दुसरा दिवस उजाडला तेव्हा अक्षरशः आम्ही स्वर्गात पोचलेलो.
खरंच, सह्याद्रीच्या स्वर्गात..!!!
अशा लोकांकडून मिळणारा जिव्हाळा हीच प्रेमाची ऊर्जा मला कायम प्रेरित करत असते अशा अनवट रानवाटा भटकण्यासाठी..!!!
ट्रेक जसा जसा पुढं जात होता तसेतसे चर्चेच्या विषयांत बदल घडत होतेच, दुसरा दिवस अपेक्षेप्रमाणे गुळपाड्या लोकांच्या #लवण्यवंत अशा गुणांचा उद्धार करत, अहं-उहूं करत.
सोनपापडी खात खात, #अनारश्याला कोलुन, सावित्री नदीत जलपरे (पुल्लिंगी वाचावं) बनत, मजल दरमजल करत मुक्कामच्या जागी पोचतो..!!! सायंकाळी जेवणाची सूत्रे हलतात, जंगी बेत रचून तुपातला भात खाऊन दिवस संपतो..!!!
एव्हाना ट्रेकचे दोनच दिवस झालेलं असतात…
पाठीमागे प्रतापगड पाठीशी खंबीर दिसत असतो अन सर्वांना आता रायरीचा पर्वत खुणावत असतो.
म्हणून पोरं पुन्हा पहाटेच तयार होऊन, रायरी जवळ करतात, गुयरीचा डोंगराला वळसा घालून (रायरीला पाहून, मनाशी एक निर्धार करूनच) पायथ्याच्या टप्प्यात पोचल्यावर रायगडाचे प्रथम दर्शन सर्व थकवा दूर करते.
आणि नव्या जोमाने रायगडाकडे पावले वेगाने धावून जातात. मागच्या तीन दिवसात साठच्या वर किलोमीटर चालून, अनेक दीड-दोन हजार फुटाचे डोंगर चढून उतरून, इतिहास जगत, महाराजसाहेबांना आठवत.
रायगड हे एकच ध्येय डोळ्यासमोर ठेऊन केलेली तंगडतोड, त्यामुळे सुजलेले पाय, फुटलेल्या नडग्या, गुडघे हे सगळं दुखणं क्षणार्धात आटून जात जेव्हा चित दरवाज्यासमोर पोरं येतात अन अखंड पुरुष भासणाऱ्या रायरीच्या पर्वतासमोर लोटांगण घेऊन नतमस्तक होतात…
कारण रायगड म्हणजे अखंड ऊर्जेचा कधीही न संपणारा स्रोत..!!!
इथं येऊन सदरेवर थोरल्या महाराजांना मुजरा करून त्यांच्या समाधी जवळ जाऊन भरून आलेलं मन रीत करायचं आणि जगण्यासाठी साथ हत्तीचं बळ घेऊन गड उतरायचं एवढंच आपल्या मनाला ठाव असतं..!!!
शेवटी, हा ट्रेक म्हणजे एक मोठं चॅलेंज होतं जे टीमवर्क ने शक्य झाले, प्रॉपर मॅनेजमेंट, वेळोवेळी घेतलेले जिकरीचे पण योग्य असे निर्णय.
आणि सर्व पोरांनी दिलेली साथ यामुळेच हा कठीण श्रेणीतील ट्रेक पूर्णत्वास गेला…
पूर्ण टीमचे खूप खूप आभार आणि अभिनंदन ..!!!
लिहितांना काही चूक झाल्यास माफी असावी…
आवडल्यास Like आणि Share करा.
©तेजस डोळे
सोर्स: Omkar Naigaonkar यांच्या वॉल वरून.