
ऑनलाईन शिक्षण विद्यार्थ्यांच्या अन् पालकांच्या मुळावर तर उठत नाही ना!
Side Effects of Online Classes
©रवी निंबाळकर
काल कामानिमित्त माझ्या एका नातेवाईकाच्या गावी गेलो होतो. यावेळी काही शिक्षकांशी व काही गावातील लोकांशी गप्पा झाल्या.
तेव्हा ऑनलाईन शिक्षण, मोबाईलची रेंज, गेम खूप खेळतात, लेकरं join होत नाहीत, इ. बऱ्याच गोष्टी चर्चेत आल्या.
तेव्हा समजलं की त्या छोट्याश्या खेड्यागावातील आठवीच्या तीन तर एक दहावीची अशा चार मुली पळून गेल्या आहेत.
एका मुलीचा बाप तर आत्महत्या करायला निघाला होता. गावातील काही प्रतिष्ठित लोकांनी समजून सांगितले.
पुढे लग्न करू वगैरे असे काही तोडगे निघाले. (लग्न म्हटलं तर पुन्हा प्रश्न निर्माण होतो तो बालविवाहाचा!)
छोट्याश्या खेड्यात जर अशा मानहानीकारक गोष्टी घडल्या तर त्या आई-बाप, त्या कुटुंबाची मानसिक अवस्था काय असेल ओ! याचा विचार करेल का कोणी?
भाऊ भावकी, शेजारी पाजारी, पै-पाहुण्यात तोंड दाखवायला जागा उरली नाही, असं म्हणून ते जीवाला किती खाऊन घेत असतील?
माझ्या माहितीतील एका आठवीच्या तर एका सातवीच्या मुलाने मागील महिन्यात आत्महत्या केली. त्यांच्या पालकांनी गुगल सर्च वरती आपला मुलगा काय पहात होता हे पाहिले तर अतिशय धक्कादायक माहिती समोर आली आहे.
ज्याचं पोटचं पोरग या Mobile – Internet च्या मोहजाळ्यात अडकून आपला जीव गमावतोय त्या आईची, त्या बापाच्या मनस्थितीचा विचार होईल का?
मोठमोठ्याल्या शहरातील विद्यार्थ्यांच्या गोष्टी वेगळ्या आहेत ओ!
कारण, ती पोरं जन्माला यायच्या अगोदर पासूनच घरात चार-चार Mobile, Tablet, Computer, Laptop, इ. तंत्रज्ञान त्यांच्याकडे उपलब्ध असतं त्याला त्याचं काही नवल नसतं.
पण आमच्या गावाकडच्या लेकरांनी बापाकडचा बटनाचा मोबाईल बघितला असतो. काॅम्प्युटर शाळेत असतो पण तो ही जाता येता खिडकीतून बघितलेला.
कधी वर्गात जाऊन बघितला तर तो शिक्षकांनीच चालवलेलाच. अन् समजा कधी एखाद्यानं जर नुसतं की-पॅड हात जरी लावला तरी त्याला किती आनंद होते की जसा की स्वतःच काॅम्प्युटर चालवला.
समजा एखाद्या उपक्रमशील शिक्षकाने – एखाद्या शाळेने विद्यार्थ्यांना काॅम्पुटर शिकवायाचा, त्यांना हाताळून द्यायचा असं जरी ठरवलं तरी खेड्यात लाईट असते तरी किती वेळ?
आणि अशा लेकरांच्या हाती जर android मोबाईल आला तर ही लेकरं भांबावून जाणार नाहीत का?
हातात android mobile अन् तासन् तास पब्जी सारखा गेम यामुळे तर मुलांना मानसोपचारतज्ज्ञाकडे घेऊन जायची वेळ आली आहे.
‘मुळशी पॅटर्न’ या मराठी चित्रपटातील राहूल्याचा एक संवाद आठवतो त्या तो म्हणतो की;
“आमच्या जमिनी विकून करोडो रुपये आले हो! पण ते कसे खर्च करायची अक्कल बी दिली असती तर आम्ही गुन्हेगारीकडे वळालो नसतो.”
तसेच आज बहुतेक पालकांनी परिस्थिती नसतानाही आपल्या लेकरांना android mobile घेऊन दिला आहे. पण तो कशासाठी वापरावा?
कितीवेळा साठी वापरवा? याची समज कोणी द्यायची?
ऑनलाईन शिक्षण फक्त विद्यार्थ्यांचे नाही तर त्यांच्या पालकांचे ही बळी घेत आहे असं वाटत आहे.
म्हातारी मेल्याच दु:ख नाही पण काळ सोकावत आहे.
खरच कुणी तरी सर्वे करावा अन् ग्रामीण भागातील सध्याची ऑनलाईन शिक्षण अवस्था बघून घ्यावी.
यातून लक्षात येईल की बालमजुरी अन् बालविवाह किती होत आहेत हे ही लक्षात येईल.
मोबाईल वाईट नाही… परंतू वापर योग्य होणे गरजेचे आहे…
सध्या YouTube वरचा शैक्षणिक किंवा प्रेरणादायी Video पाहताना सुद्धा Online Rummy किंवा वेगवेगळ्या जाहीरातींचा एवढा भडीमार असतो की त्यामुळे विद्यार्थी लवकरच विचलित होतात…
या गोष्टींमध्ये एवढे गुंततात की ते Addicted होतात…
पालकांनी पाल्यावर लक्ष देणे गरजेचे आहे…
असो! काल जी आम्हा लोकांत चर्चा झाली ती मन सुन्न करणारी होती.
©रवी निंबाळकर
RELATED POSTS
View all
